Cyanide - 16 books and stories free download online pdf in Marathi

सा य ना ई ड - (प्रकरण १६)

सा य ना ई ड
प्रकरण १६

अलक्षचंद्र मालशेटवार हा बॅलॅस्टिक म्हणजे बंदुकीच्या गोळ्यांच्या क्षेत्रातील तज्ज्ञ होता , कोर्टाच्या समोरच त्याने वजन केले.” पाणिनी पटवर्धन म्हणतात ते एकदम बरोबर आहे.घरातील बंदुकीच्या खोलीतून मिळालेल्या कवचावर क्र.५ असा अंक कोरला आहे. त्यातील शिशाच्या गोळ्या सरासरी एकशे सत्तर औंस वजनाच्या आहेत.हे कवच रेमिंग्टन कंपनीने बनवले आहे. पुरावा क्र २ मधील गोळ्या याच कवचातील आहेत. या दोन कवचातील गहाळ असलेल्या शिशाचे वजन आणि या बाटलीतल्या गोळ्यांचे वजन अगदी सारखे आहे. या उलट पुरावा क्र.अ विषाची बाटली यातील शिशाच्या गोळ्या या आकाराने लहान आहेत आणि ते घरात सापडलेल्या कवचा मधील असतील असे मला वाटत नाही.”

तो पुढे म्हणाला.” कोर्टाने जर नीट पाहिले तर लक्षात येईल की या गोळ्यांवर एक प्रकारचे आवरण आहे आणि बहुदा ते शाईचे आवरण आहे.”

“ शाई ! “ न्यायाधीश उद्गारले.

“ हो, या शहरात काही हॉटेल्स मधे हेरिटेज म्हणून लिखाणासाठी टाक वापरले जाते. त्या हॉटेल मालकाला जुन्या वस्तूंची आवड आहे. त्या मालकाची तीन चार हॉटेल्स आणि क्लब आहेत. त्या ठिकाणी लिखाणाच्या कामाला टाक वापरले जातात. लिखाणाचे काम झाल्यावर टाक ठेऊन देण्यासाठी एका काचेच्या पेल्यात शिशाच्या गोळ्या घालून त्यात टाक खुपसून ठेवायची पद्धत आहे. अर्थात ही फार पुरातन पद्धत आहे हल्ली पेन आणि बॉल पेन च्या काळात टाक कोण वापरणार? पण त्याच्या काही हॉटेलात व क्लब मधे ‘हेरिटेज’ म्हणून ती टाक वापरण्याची पद्धत अजून अस्तित्वात आहे. टाका मधे शाई शिल्लक राहिली की नीब खराब होते , ते होऊ नये म्हणून शिशाच्या गोळ्या पेल्यात भरून त्यात टाक बुडवून ठेवला की शाई निबा वरून झिरपून शिशावर ओघळते.शिशामध्ये तसा गुणधर्म असतो. विषाच्या बाटलीत असलेल्या शिशाच्या गोळ्या ला असे शाईचे दाग दिसले.”

“ मी कोर्टाला विनंती करतो की पोलिसांना आदेश द्यावेत की मिलिंद बुद्धीसागर ज्या ज्या क्लब मधे जातो तिथे अशा प्रकारचे टाक वापरले जातात का आणि आणि ते खुपसून ठेवण्यासाठी शिशाच्या गोळ्या असलेल्या पेल्याचा वापर केला जातो का हे पाहावे..”

“ अशा प्रकारच्या शाई लागलेल्या शिशाच्या गोळ्या मिळाल्या तर त्याची तपासणी करून ती शाई आणि विषाच्या बाटलीतील शिशाच्या गोळ्यांना लागलेली शाई एकाच प्रकारची आहे का ते पाहावे.” पाणिनी कडाडला.

न्यायाधीशांनी मिलिंद बुद्धीसागर कडे पाहिले.” पाणिनी पटवर्धन यांनी अत्ता सांगितल्या प्रमाणे सर्व करायचे आदेश देण्यात येत आहेत”

“ त्याची काही गरज नाहीये.” मिलिंद बुद्धीसागर म्हणाला. साक्षीदाराच्या पिंजऱ्यात येऊन तो म्हणाला,” पाणिनी पटवर्धन म्हणाल्या प्रमाणेच घडलंय.मीच त्या क्लब मधूनच पेल्यामधील शिशाच्या गोळ्या घेतल्या.”

“ तुम्ही काय म्हणताय ते मला समजल्या नुसार तुम्हीच त्या पेल्यातून घेतलेल्या गोळ्या पुरावा क्र. अ मधील बाटलीत टाकल्यात?” न्यायाधीशांनी विचारणा केली.

“ होय साहेब”

“ विष असलेल्या बाटलीत?”

“ हो.”

“आणि काय केले त्या बाटलीचे नंतर ?”

“ मी तळ्यात टाकली “

“ विषाची बाटली च तुम्ही तळ्यात टाकली, जिला आपण पुरावा क्र. अ म्हणतोय?”

“ हो”

“ तुम्ही पाणिनी पटवर्धन नं असे सांगितले की तुम्ही तळ्यात फेकलेली बाटली गोड गोळ्यांची म्हणजे पुरावा क्र.ब होती?”

“ हो.”

“ न्यायाधीश रागावून म्हणाले,” खोटी साक्ष दिल्या बद्दल आणि खुनाच्या संशायाबद्दल या माणसाला प्रथम तुरुंगात टाका. क्लब मधे जाऊन पोलिसांनी प्रथम पुरावा ताब्यात घ्यावा.”

पाणिनी पटवर्धन ने सूचना केली,” कोर्टाने त्याला आधी विचारावे की त्याला सायनाईड कुठून आणि कसे मिळाले.”

न्यायमूर्ती मिलिंद बुद्धीसागर कडे वळून रागाने म्हणाले,” तुम्ही या कोर्टात धडधडीत खोटी साक्ष देण्याच्या आरोपाखाली दोषी ठरला आहात. तुमच्यावर खुनाचा आरोप ठेवला जाऊ शकतो.तुम्ही जे बोलाल त्याचा वापर तुमच्या विरुध्द केला जाऊ शकतो.हे सगळ तुमच्या निदर्शनाला मला आणायचंय.तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमचा वकील देऊ शकता. आता मला सांगा की त्या बाटलीत टाकण्यासाठी तुम्हाला सायनाईड कुठून मिळालं?”

“ निमिष जयकर काम करत असलेल्या लॅब मधून ! माझ्याशी संबंधित एक खनिजाची कंपनी आहे, त्याचे एक काम जयकर ची लॅब करत आहे. खर तर माझ्या मुळेच ते काम त्याना मिळाल आहे.”

“ म्हणजे हर्षल मिरगल च्या मृत्यू ला कारण ठरलेले विष तुम्हीच दिलेत?” न्यायमूर्ती नी विचारले.

मिलिंद बुद्धीसागर ने त्यांच्या कडे घाबऱ्या नजरेने पाहिले. ” नाही “ तो उद्गारला.

“ नाही ? ” न्यायाधीशांनी आश्चर्याने विचारले.

“ नक्कीच नाही, पण मी हे आता कसे सिध्द करू शकणार हे देवालाच माहीत.”

“ तू हे सर्व का केलेस मग?” हळुवार आवाजात पाणिनी ने विचारले.

“ माझ्या बायकोला वाचवण्यासाठी.मी हे केले तेव्हा मला विश्वास होता की अनन्याचा कबुली जबाब म्हणजे तिला झालेला भ्रम होता, आधीच खच्चीकरण झालेले मन आणि त्यात त्या औषधाचा प्रभाव. पण मला वाटत होत की माझ्या बायकोनेच त्याला मारले आहे आणि मी बायकोला वाचवायला गेलो.”

“ कसा वाचवणार होतास तू तिला?” पाणिनी ने विचारले.

“ज्या क्षणी अनन्याने तिचा कबुली जबाब टेप वर दिल्याचे मला समजले, तेव्हाच मी ओळखले की पोलीस बाटली शोधायला तळ्यात कुणालातरी पाठवतील.त्यांना जर शिशाच्या गोळ्या भरलेली सायनाईड ची बाटली सापडली नाही तर अनन्याचा कबुली जबाब हा काल्पनिक ठरेल पण बाटली सापडली तर तो खरा ठरेल.”

मग पुढे काय केलेस तू?” पाणिनी ने विचारले.

”माझ्या घरात काही काळ सायनाईड च्या गोळ्या होत्या.हर्षल मिरगल च्या मृत्यू पूर्वी साधारण महिनाभर मला त्या मिळाल्या होत्या.आमच्या बागेतल्या फुलांच्या ताटव्याला कुत्र्यांचा त्रास होत होता.कुत्री ताटवा नष्ट करायची, बायकोने ठरवलं की त्यांना विष घालू. मी तिला सांगितलं की तो गुन्हा आहे. पण ती सुडाने पेटली होती.मी तिला समजावलं की आपण विष खरेदी केले तर ते शोधून काढले जाऊ शकते.शेवटी त्यावर वाद होऊन मी ते निमिष जयकर च्या लॅब मधील त्या जार मधून सायनाईड आणायला तयार झालो.माझ्या खनिजाच्या कंपनीला खोदाई च्या काम करता लागणाऱ्या मिश्र धातू वर जयकर ची कंपनी रासायनिक प्रक्रिया करण्याचे काम करत होती त्यामुळे मी त्या कंपनीत वरचेवर जात असे.”

“ आणि त्यामुळे तू असे गृहित धरलेस की तेच सायनाईड तुझ्या बायकोने हर्षल मिरगलला घातले.?” पाणिनी ने विचारले.

मिलिंद बुद्धीसागर ने मानेने होकार दिला. पाणिनी ने पुढे विचारले,” म्हणून तुला अस वाटलं की पोलिसांना जर तळ्यात विषाची बाटली सापडली तर त्यांना तुझ्या बायकोवर संशय न येता अनन्यावरील टेप वरील जबाबामुळे असलेल्या संशयाला बळकटी येईल?”

“ मला वाटलं की कुत्री मेल्या मुळे आमचे शेजाऱ्यांना संशय आला होताच,त्यामुळे माझ्या मार्फत बायको पर्यंत पोलीस पोचतील.” मिलिंद बुद्धीसागर म्हणाला.

“ म्हणून मी जेव्हा तुझ्याशी बोललो तेव्हा तुला भीती वाटली की दोन पैकी एक बाटली तळ्यात टाकल्याचे माझ्या लक्षात येईल म्हणून स्वतःला वाचवण्यासाठी तू साध्या गोड गोळ्यांची बाटली तळ्यात टाकल्याचे विधान केलेस?”

“ बरोबर आहे.”

“ तुझ्या बायकोने त्याला विष दिले अस तुला वाटायचं कारण काय आहे?’

“ तेव्हा मला वाटलं होत, आता मला माहित्ये की तिने नाही केलेले तसे”

“ तुला कसे माहीत झाले ते?’

“ कारण तिनेच मला तसे सांगितले.”

खांडेकर उठले आणि कंटाळलेल्या सुरात म्हणाले, “ पुन्हा पुन्हा तेच तेच आणि त्याच टिकाणी गरगर फिरतोय आपण.पुरावे आणि साक्षीदार यांचा....”

“ खाली बसा आणि गप्प रहा.” न्यायाधीशांनी फटकारले.” मी ऐकणार आहे हे सगळच. आपण खटल्याचा उलगडा होण्याच्या मार्गावर आहोत. तुम्हाला अपेक्षित असे यातून येणार नाही पण कोर्टाला आणि न्यायला अपेक्षित ते बाहेर येईल यातून. तेव्हा मधे मधे बोलू नका.”

“ तर मग मिलिंद बुद्धीसागर तुम्ही म्हणालात की तुमच्या बायकोने त्याला मारले नाही कारण तिने तुम्हाला तसे सांगितले?’- न्यायाधीश

“ होय साहेब.”

“ पण पहिल्यांदा तुम्हाला का वाटले की तिने त्याला मारले असावे?’

“कारण त्याच्या मृत्यू च्या वेळी ती तिथे होती.मला माहिती आहे की चॉकलेट बनवले जात असताना ती खालच्या मजल्यावरील जेवणाच्या खोलीत गेली होती.अनन्या कुठे दिसते का तिने पाहिले,पण ती दिसली नाही बलदेव ला तिने हक मारली , तो ही जवळपास नव्हता. ती सहज आत जाऊन जिथे चॉकलेट बनवले जात होते त्या शेगडी पर्यंत पोचू शकत होती. म्हणून मी गृहित धरल की तिनेच...”

“ पण तिने त्याला मारायचं कारण काय?”

“ कारण तिला अशी माहिती मिळाली होती की त्यामुळे ती अस्वस्थ होती “

तिला समजलं होत की हर्षल मिरगल ने त्याच्या भागीदाराचा खून केला होता.आणि तो भागीदार म्हणजे अनन्याचा बाप होता.तिला हे माहीत होत म्हणून तिने हर्षल मिरगल कडून अनेक गोष्टी मिळवल्या.त्यानेही त्या दिल्या कारण आपण गुन्हेगार आहोत याची त्याला जाणीव होती.त्याने लीना जवळ सुध्दा या गुन्ह्याची कबुली दिली होती.”

“कधी दिली होती कबुली?”

“मरणाच्या आदल्याच दिवशी”

“ म्हणून तुम्हा दोघांना असे वाटले की त्याच्या कबुली मुळे त्याच्या मालमत्तेतील वारस म्हणून तुम्हाला मिळणाऱ्या हिश्श्यात अडचणी येतील आणि अनन्या गुळवणी चा हक्क शाबित होईल?”

“ त्यापेक्षा सुद्धा महत्वाची गोष्ट आहे ती अशी की भागीदाराच्या मृत्यू नंतर हर्षल ने अनेक लफडी करून भागीदाराची मिळकत सुध्दा लुटली. भागीदाराच्या मृत्यू पत्रा नुसार त्याचा भागीदारीतील हिस्सा , त्याची पत्नी रीमा गुळवणी च्या नावावर होता. अनन्याने जर वकील लावला असता आणि मागणी केली असती की भागीदारीमधील मालमत्ता आणि नफ्याचा हिस्सा, मिरगल ने नाखुशीने बाजुला ठेवला आहे तो मला मिळावा तर परिस्थिती चिघळली असती.”

“ अनन्याला सर्वच गोष्टी माहीत होत्या असे नाही. तिला साधारण अंदाज होता पण पुरावा कशाचाच नव्हता.हर्षल मिरगल मृत्यू शी झगडत होता, घाबरला होता. आमच्या समोर त्याने त्याचा अपराध कबूल केला.”

“ तुझ्या समोर की बायको समोर?”

“ दोघांसमोर”

“ आम्ही त्याला सांगितलं की आपण वकीलाला भेटल्या शिवाय काही करायचे नाही.”

“ तुम्ही भेटलात वकिलाला?”

“ नाही., तुम्ही समजून घ्या, त्याचा मृत्यू विषामुळे झाला असता .... ती जागा खनिजाच्या खाणीच्या दृष्टीने फार किंमती आहे...”

‘ म्हणून तुम्हाला वाटलं की तुमच्या बायकोने त्याला मारले?’

“या मुळे ही वाटले आणि त्या शिवाय ती जे काही म्हणाली त्यामुळे पण वाटले.”

“ ती काय म्हणाली”

“ लीना म्हणाली की आपल्या हात तोंडाशी आलेली संधी ती अनन्याला मिळवू देणार नाही.आम्ही त्यावर बरीच चर्चा केली, तिने मला विचारलं होत की .... की,.. आपण त्याच्या चॉकलेट मधे थोड्या सायनाईड च्या गोळ्या टाकल्या तर काय होईल...मी..मी या सगळ्या सापळ्यात अडकलोय. पण... लीना म्हणत्ये की तिने नाही घातल्या गोळ्या त्यात.”

“ अच्छा ! “ न्यायाधीश तिरस्काराने म्हणाले.” हर्षल मिरगल हा खुनी आणि अफरातफर करणारा आहे हे माहीत असून आणि त्याने अनन्याला फसवून तिला भागीदारी मधील वारस म्हणून वंचित केले आहे याची कल्पना तुम्हाला असून सुद्धा सत्य उघड करण्याचा प्रयत्न न करता त्याला मारण्यासाठी किती गोळ्या लागतील याची चर्चा केली? “

“ आम्ही ... म्हणजे.. त्या आशयाचं बोलणं केलं पण तुम्ही वर्णन केले तसे थंड डोक्याने खुनाची योजना वगैरे आखण्याच्या दृष्टीने नाही. एक शक्यता गृहित धरली एवढंच.”

“ आणि तुम्ही गृहित धरलं की तुमच्या बायकोने त्याला मारलंय. तुमच्या साक्षीमधील तुमचे सर्व मुद्दे विचारात घेऊन सुध्दा केवळ तुमची बायको सांगत्ये की तिने त्याला मारले नाही म्हणून तुम्हाला वाटतंय की ती निष्पाप आहे म्हणून?” न्यायाधीशांनी विचारले.

“ जर लीना ने तसे केले असते तर मला सांगितले असते. ती कधीही म्हणजे कधीही खोट बोलत नाही माझ्याशी.तिचे नुकसान होणार असेल खरं बोलल्या मुळे ,तरीही ती खरंच बोलते.” प्रकाश बुद्धीसागर म्हणाला.

“ तुमच्या या विधानातली नैतिक अधोगती ची नोंद कोर्टाने घेतली आहे.” न्यायाधीश म्हणाले.” कोर्ट आपले कामकाज थांबवत आहे.या साक्षीदाराला कैदेत टाकण्याचे आदेश पोलिसांना देण्यात येत आहेत आणि लीना बुद्धीसागर हिला पोलिसांनी अटक करावी आणि तिच्यावर आणि तिच्या नवऱ्यावर खुनाचा आरोप ठेवावा .” कोर्ट आज दुपारी चार वाजे पर्यंत कामकाज स्थगित करत आहे. एवढे बोलून त्यांनी हातोडा जोरात आपटला.

पुढे चालू......प्रकरण १७ मधे पुन्हा धक्का.......?????