Pralay - 5 books and stories free download online pdf in Marathi

प्रलय - ५

प्रलय-०५

   " आता काय करायचं भिल्लवा , "  सरोज वैतागून भिल्लवाला म्हणाली  .  त्यांच्यासमोर वीस सैनिक व मागच्या बाजूला पाच सैनिक ,  असं त्यांच्या भोवती पंचवीस सैनिकांचा गराडा पडला होता .   महाराज विक्रम त्यांना देशद्रोही ठरवून फाशी द्यायला कमी करणार नव्हते . कसेही करून त्यांना प्रधानजींना घेऊन थेट तिथून जायलाच हवे होते . चौघेही लढायला सिद्ध झाले .  सैनिक त्यांच्यावर चाल करून येणार त्या अगोदरच त्यातील काही सैनिकांनी इतर सैनिकांना मारायला सुरुवात केली . सैनिका सैनिकांमध्ये लढाई सुरू झाली होती . या चौघांना काहीच कळेना हे काय चाललं होतं .  मागून आलेल्या सहा सैनिकांना या चौघांनी मिळून जागीच ठार केलं।   आणि सैनिका सैनिकांमध्ये झालेल्या लढाईत आठ सैनिक जिवंत राहिले .
" अरे वा प्रधानजीनी त्यांची व्यवस्था अगोदरच केलीय म्हणायची ,  भिल्लव त्या आठ सैनिकांकडे पाहत म्हणाला . " आमच्या अगोदरही प्रधानजजीला कोणीतरी सोडवायला आले म्हणायचे..... , चला आपल्याला आता गडबड केली पाहिजे..... 
" भिल्लवा ओळखलं नाहीस का मला....?  त्या आठ सैनिकातला सगळ्यात हट्टाकट्टा व पहिलवान सैनिक त्याला म्हणाला , 
" अरे हा तर देशद्रोह्यांच्या टोळीचा प्रमुख योद्धा दिसतोय....
"  काय भिल्लवा तुही असच बोलतोयस , तुला माहितीये सारं काही , आणि तु ही आम्हाला देशद्रोही म्हणतोयस.....
"  अरे सर्थक चेष्टा करतोय मी .....
असं म्हणत भिल्लवाने सार्थक ला मिठी मारली ....
"  तुमचा बंधू मिलाफ झाला असेल तर मला सोडवाल का......?
 प्रधानजी बाजूच्या तुरुंगातून म्हणत होते
 " क्षमा असावी प्रधानजी लगेच सोडवतो ,
 असं म्हणत सार्थक व ते सात सैनिक पुढे झाले . त्यांनी तुरुंगाचे दार तोडून काढले . आत जात प्रधानजीच्या हाताला बांधलेल्या साखळ्या त्यांनी तोडून काढल्या .  अन्वी ने पळत जाऊन तिच्या बाबांना मिठी मारली . 
" अन्वी बाळा तुला किती वेळा सांगितले ,  नसते पराक्रम करत जाऊ नकोस  .....
" बाबा मी तुम्हाला फाशी जाताना कसं पाहू शकत होते....?
"  तुला असं वाटलं का , कि  मी गपचुप फाशी गेलो असतो....? , देवव्रत तू तरी कमीत कमी आन्वीला समजवायचं होतं ....? 
" हा कसला समजावतोय , हाच तिला घेऊन आलाय.....
 सरोज प्रधानजीला म्हणाली , देवव्रताने सरोज कडे रागाने बघितलं , त्याच्या नजरेत एका युवराजचा अपमान झाल्या सारखा भाव  होता . मात्र प्रधानजीना अन्वी बरोबर संभाषणात असल्याने सरोजजचं हे वाक्य त्यांना ऐकू गेलं नाही . 
 " आपण त्या भुयारी मार्गाने जाऊ म्हणजे सैनिकाची आपल्यावर नजर पडणार नाही .....
" अरे भिल्लवा तुझ्या मार्गाने गेलो   तर आपण नगरातच पोहोचू ,  आपल्याला लवकरात लवकर नगराबाहेर जायला हवं . त्यासाठी मला एक गुप्त मार्ग माहित आहे ...... 
" काय बोलत आहात प्रधानजी , मी हेरखात्याचा प्रमुख असून मलाही तो गुप्त मार्ग माहित नाही ......
" अरे भिल्लवा काही गोष्टी फारच गुप्त ठेवाव्या लागतात....
"  चला लवकर.....
   प्रधानजी पुढे ,  बाकी त्यांच्या मागे निघाले......

    जलधि राज्याच्या संशोधन शाळेत जेव्हा दारात उभ्या असलेल्या इसमाने बासरी वाजणाऱ्या दोन बाटी जमातीच्या लोकांना ठार केले व नायका वरती बाण सोडला , त्यावेळी कौशिकाने नायका वरती उडी घेत बाटी समाजाच्या नायकाला वाचवले . पण संगीत बंद झाल्यामुळे इतका वेळ शांत असलेला तो हेर पुन्हा आक्रमकपणे ओरडत त्याच्या क्रिया करू लागला.....

" सैनिकांनो महाराजांना व सर्व मंत्रीगनांना सुरक्षितपणे येथून बाहेर घेऊन जा ,  आणि काही जण  ज्यानं बाण मारला त्याच्या मागे जा.......
       कौशिकाने सर्व सैनिकांना आदेश दिला . पण त्या हेराने ' सिरकोडा इसाड कोते ' असं ओरडत बाजूला पडलेले भाले घेऊन एकापाठोपाठ एक सैनिकांवर ती फेकायला सुरुवात केली . तेथील भाले संपल्यानंतर ,  कोपऱ्यात पडलेला धनुष्यबाणाकडे तो पळाला . मात्र त्याआधीच कौशिकने तलवार फेकून त्याचा पाय जायबंदी करायचा प्रयत्न केला , पण त्याने चपळतेने ती तलवार चुकवली व तेथील धनुष्यबाण त्याच्या हाती घेतला . ज्यावेळी त्याने धनुष्यबाण हाती घेतला , त्याच वेळी कौशिकने सर्व सैनिकांना त्यांच्या ढाली महाराजांच्या व मंत्री यांच्या रक्षणासाठी समोर धरायला सांगितल्या  . मात्र त्याआधीच त्या हेराने ' सिरकोडा इसाड कोते '   असे  ओरडत महाराजांवर ती एक बाण चालवला . आलेला बाण चुकवण्यासाठी महाराज खाली वाकले ,  तेव्हा त्याने दुसरा बाण चालवला .  तो बाण महाराजांना लागणार , मात्र एका शिपायाने पुढे होत तो बांध त्याच्या ह्रुदया वरती झेलला . ढालीच्या सुरक्षीततेखाली सर्व सैनिकांनी महाराजांना व मंत्रीगनांना बाहेर नेले .  त्यापाठोपाठ कौशिक बाहेर पडत , त्याने संशोधन शाळेच्या दाराला कुलूप घातले तो हेर एकटाच आत मध्ये ओरडत नासधूस करत बसला . 

   आयुष्यमान  व भारत उत्तरेकडे निघाले होते . प्रत्येक पावकोसा वरती असलेल्या गोल खड्ड्यांमध्ये एक काळा व त्यापुढील खंडांमध्ये पांढरा असे बी टाकत त्यांची यात्रा चालू होती .  आतापर्यंत त्यांनी 22 खड्डे संपवले होते . पुढच्या खड्ड्याकडे जात असताना भरत्या म्हणाला
" आयुष्यमान तुला काय वाटतं वेड्या आबाजीला खरंच आपल्या कार्याची माहिती असेल का ....? आपण त्याचं ऐकून काही चूक तर करत नाही ना....? 
" तुला माहित आहे का ज्यावेळी आपल्या अगोदरच्या वारसदारांनी आपली निवड केली त्यावेळी आपल्याला एक वाक्य सांगितलं होतं  ' इसाटीकोपा मिसाटीकोपा ' म्हणजेच " मार्ग एकच आहे,  लक्ष एकच आहे " आणि हेच वाक्य तुम्हाला तुम्हाला पुढे मदत करेल असेही ते म्हणाले होते.....
" ते माझ्याही लक्षात आहे पण मला त्या वेड्या आबाजीचा विश्वास वाटत नाही .  मला वाटतं तो वेडेपणाच सोंग करतोय त्याच्या मागं नक्कीच काहीतरी गोम आहे.....
" भरत तू फारच विचार करतोयस , ज्यावेळी त्याची व माझी पहिली भेट झाली होती त्यावेळी तोच मला म्हणाला ,  ' इसाटीकोपा मिसाटीकोपा ' आणि हे वाक्य फक्त वारसदारांनाच माहीत असतं.....
" पण आयुष्यमान तू हे विसरतो की एकदा वारसदाराने पुढचा वारसदार निवडल्यानंतर त्याला मागच्या सर्व गोष्टी विसरून आपल्या दैनंदिन आयुष्य जगायचं असतं , आणि कोणत्याही परिस्थितीत नव्या वारसदाराशी संपर्क साधायचा नसतो....
" अरे भरत हे नियम मोडण्यासाठीच असतात .  आता त्या मूर्ख विक्रमाने काळी भिंत पाडण्याची आज्ञा दिली आहे , आणि तसं जर झालं तर जो आहाकार माजेल तो थांबवण्यासाठी हे असले फालतू नियम कामाचे नाहीत....

ते बोलत बोलत पुढच्या खड्ड्या पाशी आले होते .  आयुष्यमाने पिशवीतून एक काळा बी काढला व त्या खड्ड्यामध्ये टाकला , ज्यावेळी बी खड्ड्यांमध्ये पडला त्यावेळी तो जमिनीत रुतायला लागला व त्यातून छोटासा काळा अंकुर बाहेर पडला.....

    त्याच वेळी भरत व आयुष्यमान दोघांच्याही कानावरती कुणीतरी हाक मारत असल्यासारखा आवाज पडला . त्यांनी मागे वळून पाहिले दुरून एक घोडेस्वार त्यांच्याकडे येत होता . अंधार पडायला आला असल्याने त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता , पण ज्यावेळी तो जवळ आला त्यावेळी आयुष्यमानला एक सुखद धक्काच बसला . तो घोडेस्वार नव्हता ,  ती एक स्त्री होती .  ती तीच होती जिच्याकडून आयुष्यमानाने त्या बिया घेतल्या होत्या . जिच्या आठवणीत तो रमला होता.....

   महाराणी शकुंतला छोट्या राजकुमारांना घेऊन घोड्यावरती स्वार होऊन निघाल्या खऱ्या , पण दोन-तीन कोसाच्या अंतरावर जाताच घनदाट अंधार पडला . जंगली श्वापदांचा ओरडण्याचा आवाज येऊ लागला .  इतक्या दिवस जंगलात राहत असूनही त्यांना त्या आवाजाची अजिबात सवय झाली नव्हती . त्या जरा घाबरल्याच . इतका घनदाट अंधार पडला होता की हात भरा वरचे डोळ्याने नीट दिसत नव्हते आणि यात भर म्हणून त्यांच्याकडे मशाल ही नव्हती . नाईलाजाने त्यांनी माघारी जायचं ठरवलं....

    माघारी जाण्यासाठी त्या वळल्या खऱ्या पण त्यांच्या मागे सात-आठ घोडेस्वार उभे होते . त्यांनी त्यांची तोंड काळ्या कापडाने झाकली होती .  त्यांच्या खांद्यावरती धनुष्यबान व कमरेला तलवार लटकत होती .  ते घोडेस्वार कोण होते ? त्यांना काय होतं ? याची जराही कल्पना महाराणींना नव्हती . मुळात त्यांना लढाई अजिबात येत नव्हती पण तरीही त्यांनी बरोबर घेतलेल्या तलवारीला हात घातला . त्याचवेळी मागून कुणीतरी त्यांच्या तोंडावरती कापड टाकले , त्याला कसला तरी विचित्र गंध होता हळूहळू त्यांना जाणीव झाली त्यांच्या सर्व संवेदना बधीर होत आहेत . शेवटी त्या बेशुद्ध झाल्या व घोड्यावरून खाली पडल्या......

   काळी भिंत पडण्यासाठी निघालेल्या पहिल्या शिपाई तुकडीचा प्रमुख अभिजीत अद्वैत आजूबाजूच्या परिसराचा फेरफटका मारण्यासाठी त्याच्या विश्वासू सैनिकांबरोबर गेला होता , इकडे सैनिक शेकोटी पेटवून बसले होते . ज्यावेळी तो परतून माघारी आला , त्यावेळी त्याला जे दृष्य दिसले ते त्याच्या हृदयाचा थरकाप उडवणारं होतं . त्याच्या सर्व सैनिकांची हत्या झाली होती .  आता शेकोटीभोवती  पंधरा मनुष्य बसले होते . मारलेल्या सैनिकांची माणूस त्यांच्या हातात होते ते चवीने ते मांस खात होते व मधुनच ओरडत होते
 " सिरकोडा इसाड कोते ......
    अभिजीत अद्वैत त्याच्या विश्वासू सैनिकांबरोबर तिथून पळाला . तो कितीही शूर आणि वीर असला तरीही मूर्ख नव्हता. त्याचे दीडशे ते दोनशे सैनिक फारच पराक्रमी होते . त्याच्या तुकडीला त्याच्या राज्यातील सर्वात उच्च बहुमान मिळाला होता .  त्याची तुकडीही कधीही न हारनारी होती ..... आणि त्या संपूर्ण तुकडीच्या विनाश फक्त पंधरा लोकांनी केला होता ........

 कौशिक त्याच्या कक्षामध्ये विचारमग्न परिस्थितीत बसला होता .  जे काही झालं होतं ते नक्कीच विचार करायला लावणारं होतं . जो कोणी इसम होता आणि ज्याने ते बाण मारले होते , त्याचा नक्की हेतू काय होता हे कळणं आवश्यक होतं . त्यामागे त्याचा सर्वात विश्वासू हेर भार्गव गेला होता . तो कोणत्याही क्षणी परतून त्या इसमाला बरोबर घेऊन येणारच  याची त्याला खात्री होती. मनातल्या मनात तो लवकर येऊ दे अशी कौशिक प्रार्थना करीत होता , आणि दारात भार्गव आला . त्याने आल्या आल्या कौशिकची क्षमायाचना केली .  भार्गव त्या मनुष्याला पकडू शकला नव्हता . पण त्याला एक कळाले होते , ते म्हणजे तो मनुष्य मारुत राजाच्या आज्ञेवरुन हे सारं करत होता.....