*!! गुरु पौर्णिमा !!*
-------------------------------
आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो.
आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात.ज्यांनी महाभारत,पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा,त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे.त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी,आचार्य अद्याप झालेले नाहीत,अशी आपली श्रद्धा आहे.अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात.ज्या ग्रंथात धर्मशास्त्र,नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र,मानसशास्त्र आहे,असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला.ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात,त्या ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना‘व्यासांचा मागोवा घेतू’असे म्हणून सुरुवात केली.
व्यासपौर्णिमेच्या दिवशी ‘ओम नमोस्तुते व्यास,विशाल बुद्धे’अशी प्रार्थना करून,त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे,परंपरा आहे.आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालतआली आहे.आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो,मिळवतो,त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो.अशा या गुरूंना मान देणे,आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय.महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली,ती आजमितीपर्यंत.
आपण कोणाचे तरी शिष्य आहोत,या भावनेत एक कृतज्ञता वाटते.भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत.जनक-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक,कृष्ण,सुदामा-सांदिपनी,विश्वामित्र-राम, लक्ष्मण,परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरु-शिष्य परंपरा आहे.मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही.
भगवान श्रीकृष्णांनी गुरूच्या घरी लाकडे वाहिली.संत ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले,तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत.त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर.भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे.
गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते.पौर्णिमा म्हणजे प्रकाश.गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा,म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची,तो हा दिवस होय.
गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. *‘गुरु बिन ज्ञान कहासे लाऊ?’* हेच खरे आहे.
गुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते, तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो...
*गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll*
*गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll*
भगवान श्री राम, भगवान श्रीकृष्ण हे देवावतार असूनसुद्धा गुरुअंकित आहेत. अंधकाराचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश देणारा गुरू असतो. जो सकल जिवास चांगले शिकवितो. सुसंस्कार देतो तो गुरू. सत् म्हणजे सत्य परमात्म्याची भेट घालून देणारा, त्याला सद्गुरू म्हणावे. एकनाथ महाराज म्हणतात, तुम्हाला मंत्र, तंत्र, उपदेश देणारे भरपूर गुरू भेटतील. पण आपल्या शिष्यास सद्वस्तूची ओळख करून देणाराच सद्गुरू होऊ शकतो. सद्गुरूपेक्षाही मोठा श्रीगुरू असतो. ज्ञानोबा माउलींना एकनाथ महाराज श्रीगुरू म्हणूनच संबोधतात.
*एका जनार्दनी पूर्वपुण्य फळले।*
*श्रीगुरू भेटले ज्ञानेश्वर।।*
तसं पाहिलं तर गुरूंचा अधिकार हा सर्वश्रेष्ठ आहे. गुरू हा संतकुळीचा राजा आहे. तो माय, बाप, बंधू, भगिनी, मित्र, सगा, सोरा अशा सगळ्या नात्यांचा सूत्रधार आहे. तो ब्रह्मनंद देणारा आहे. परमसुखद आहे. फक्त ज्ञानपूर्ती आहे. द्वंद्व असण्याचं काहीच कारण नाही. कारण गुरू हा त्याचाही पुढे आहे. ज्ञानमूर्ती असल्याने त्याचे ज्ञान गगनासारखे विस्तीर्ण आहे. भावाच्या पलीकडे तो पोहोचलेला असल्यामुळे सत्त्व, रज, तम या त्रिगुणांच्या पलीकडे आहे.
*तस्मात् गुरूं प्रपद्यते*
*जिज्ञासु श्रे उत्तमम्। शाब्दे परे च निष्णातं*
*ब्रह्मण्युपशमाश्रयम्।।*
जो शुद्ध, अतिपवित्र, आत्मज्ञानी आहे. स्वआत्म्याशी रत आहे. असे असल्यामुळेच तो पूर्ण निर्भय आहे. नित्य तृप्त व सदा मुक्त आहे.
सच्चिदानंद असल्याने तोच सद्गुरू आहे. त्याला नमस्कार करून त्यांचाच आशीर्वाद संपादन करणे हे सर्वोत्तम आहे.
गुरुला समर्पित केलेले हा सण म्हणजे आपल्या गुरुसाठी प्रेम आणि श्रद्धा बाळगून ठेवा.
*श्री गुरु चरणी कोटी कोटी प्रणाम*
??
*!! राम कृष्ण हरी!!*
?